पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शुक्रवारी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या लोकार्पणानिमित्त मुंबईत येत आहेत.

पंतप्रधान अंधेरी पूर्व येथे दाऊदी बोहरा समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थित लावून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ‘वंदे भारत’ व ‘एमएमआरडीए’च्या कामांचे लोकार्पण करणार आहेत. अंधेरी मरोळ भागात रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले असून पदपथ दुरुस्त करून पादचाऱ्यांसाठी मोकळे करून दिले आहेत.

हा योग साधून पंतप्रधान येत असलेल्या मार्गावर अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान ठिकठिकाणी स्वच्छता, रस्ते, पदपथ दुरूस्ती, रोषणाई, भिंतींची रंगरंगोटी, वाहतूक सिग्नल बदल अशा विविध प्रकारच्या कामांचा महापालिकेने धडाक्यात उरकली आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून झाडांच्या वाढलेल्या फांद्यांची छाटणी केली जाते आहे. तसेच झाडांच्या मुळांजवळ लाल व पांढरा रंग वापरून झाडे सुंदर दिसतील, अशी कामे केली जात आहेत.

पदपथांना सजावटीचे दिवे लावण्यात येत असून ठराविक अंतरावर वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक रोषणाईने पदपथ न्हाऊन निघाले आहेत.

रस्त्यालगतच्या सर्व भिंती रंगवल्या जात असून रस्ते, पदपथाजवळचे विजेचे जुने ट्रान्सफॉर्मर बदलले जात आहेत. रस्त्यांवर अनेक ठिकाणी रातोरात नवीन विजेचे दिवे उभारले जात आहेत. जुने विजेचे खांब रंगवले जात असून आवश्यक तिथे दिवे बदलले जात आहेत.

क्रॉफर्ड मार्केट येथील पुलाच्या सुशोभीकरणाचे काम पालिकेने हाती घेतले आहे. फोर्ट आणि शहीद भगतसिंग मार्गावरील रस्त्यावर विजेचे दिवे लावण्यात आली आहे. कुलाबा कॉजवे, भगतसिंग रोडवरील फेरीवाले हटवून रस्ते, पदपथ अतिक्रमण मुक्त करण्यात आले आहेत.

पंतप्रधान येणार असलेल्या मार्गावर म्हणजे सांताक्रूझ, अंधेरी, विलेपार्ले, पी. डिमेलो रोड, मशिद बंदर, सीएसएमटी, फोर्ट, कुलाबा परिसरातील रस्त्यांवरील गतीरोधक काढण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधानांच्या सुरक्षा ताफ्यातील वाहनांना विनाव्यत्यय प्रवास करता यावा, यासाठी हे गतीरोधक हटवण्यात आल्याचे सांगितले जाते आहे.

पंतप्रधानांच्या मुंबई भेटीच्या निमित्ताने विमानतळ मेट्रो स्टेशनला रंगरंगोटी केली आहे. परिसरातील पदपथवार शोभेच्या झाडांच्या कुंड्या ठेवल्या आहेत. या भागांतील फेरीवाले हटवले आहेत. रस्त्यावर वाहने उभी करण्यास मनाई केली आहे. पदपथांवरील बेकायदा बांधकामे हटवली आहेत. हे चित्र संपूर्ण मुंबईत रोज दिसायला हवे. पंतप्रधानांनी दररोज यावे, म्हणजे मुंबईकरांना चांगल्या सुविधा मिळतील असे लोक गमातीन म्हणू लागले आहेत.