
मुंबई– राज्यात आज (शनिवारी) १४५ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६३५ झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा आज सहाने वाढून ३२ झाला.
आजच्या राज्यस्तरीय अहवालात खाजगी प्रयोगशाळांमधील अहवालांचा समावेश करण्यात आलेला आहे. हे अहवाल मागील काही दिवसांमधील आहेत. राज्यात आज सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मृतांपैकी एक रुग्ण मुंब्रा ठाणे
येथील तर एक रुग्ण अमरावती येथील आहे. उर्वरित चार रुग्ण मुंबई येथील आहेत.
मृत ६ रुग्णांचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत –
१) मुंब्रा येथील इलेक्ट्रिशियन असणा-या ५७ वर्षीय पुरुषाचा आज सकाळी केईएम रुग्णालयात मृत्यू झाला. या रुग्णास मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आजार होते.
२) मुंबईच्या नायर रुग्णालयात काल संध्याकाळी एका ४६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तिला
फुप्फुसाचा तसेच हृदयाचा विकार होता. मधुमेह असणा-या या महिलेला हायपोथायरॉडिझम हा
आजारही होता.
३) मुंबईच्या केईएम रुग्णालयात निवृत्त बेस्ट वाहनचालक असणा-या ६७ वर्षीय पुरुषाचा काल सकाळी मृत्यू झाला. त्यांना १० वर्षापासून मधुमेह होता.
४) मुंबईच्या केईएम रुग्णालयात ५३ वर्षीय पुरुषाचा काल पहाटे मृत्यू झाला. निवृत्त मिल कामगार
असणा-या या रुग्णाने परदेशात प्रवास केलेला नव्हता.
५) मुंबईच्या केईएम रुग्णालयात ७० वर्षीय पुरुषाचा तीन एप्रिल रोजी संध्याकाळी मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता.
६) अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात एका ४७ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. व्यवसायाने मेकॅनिक असणा-या या व्यक्तीला अस्थमाचा त्रास होता. त्याने कोठेही प्रवास केल्याचा इतिहास नाही.कोविड 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३२ झाली आहे.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –
मुंबई – ३७७ (२२)
पुणे( शहर व ग्रामीण भाग) – ८२ (२)
सांगली- २५ (०)
ठाणे मंडळातील इतर मनपा व जिल्हे – ७७ (५)
नागपूर, अहमदनगर – प्रत्येकी १७ (०)
लातूर – ८ (०)
बुलढाणा – ५ (१)
यवतमाळ – ४ (०)
सातारा, औरंगाबाद, उस्मानाबाद – प्रत्येकी ३ (०)
कोल्हापूर, रत्नागिरी, जळगाव – प्रत्येकी २ (१ जळगाव)
सिंधुदुर्ग,गोंदिया, नाशिक, वाशीम, अमरावती, हिंगोली – प्रत्येकी (१ अमरावती)
राज्यात आज एकूण ७०८ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात
आलेल्या १४,५०३ नमुन्यांपैकी १३,७१७ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ६३५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ५२ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ४२,७१३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून २९१३ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
तबलीगी जमातचे सातजण कोरोनाबाधित निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशिदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता, त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे.
आतापर्यंत प्राप्त १२२५ व्यक्तींच्या यादीपैकी १०३३ व्यक्तींशी संपर्क झाला असून त्यापैकी ७३८ जणांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी सात जण करोना बाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी दोन जण पुणे, पिंपरी- चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर एक जण हिंगोलीतील आहे.






