
मुंबई – आज राज्यात २१० नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या १५७४ झाली आहे. आज राज्यात १३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैंकी मुंबईचे १० तर पुणे, पनवेल आणि वसई विरार येथील प्रत्येकी १ आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी ९ पुरुष तर ४ महिला आहेत. आज झालेल्या १३ मृत्यूपैकी ६ जण हे ६० वर्षांवरील आहेत ५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत तर दोघेजण ४० वर्षापेक्षा लहान आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या ११ रुग्णांमध्ये (८५%) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोना (कोविड 19) मुळे राज्यात झालेल्या मृत्यूची संख्या आता ११० झाली आहे.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३३०९३ नमुन्यांपैकी ३०४७७जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १५७४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत १८८ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३८९२७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४७३८ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात या प्रकारे एकूण ४२३७४ सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी साडेसोळा लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.






