
करोना संसर्ग असलेल्या रुग्णांची संख्या काही देशांमध्ये वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची सुरुवात राज्यात करण्यात आली आहे. मात्र राज्यामध्ये रुग्णसंख्येत वाढ होत नसून ती पूर्णपणे नियंत्रणात आहे.
चीनमध्ये रुग्णसंख्या वाढल्यानंतर राज्यामध्ये त्यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रामध्येही रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र मागील पंधरा दिवसामध्ये राज्यात १५७४ रुग्णसंख्येची नोंद झाली असून तेरा जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे . करोनासाठी करण्यात आलेल्या चाचण्यांमधील पॉझिटिव्हिटी दर हा ०.०५ टक्क्यांच्या खाली असल्याचे दिसते.
राज्यातील सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये रोज वीस ते तीस रुग्णसंख्येची नोंद होत असून डिसेंबरच्या तुलनेमध्ये ही रुग्णसंख्या वेगाने खाली आली आहे. रुग्णसंख्येत घट होत असली हे चांगले लक्षण असल्याचे संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. विश्वास नायर यांनी सांगितले. आता जे रुग्ण येतात त्यांना खोकला, सर्दी, घसादुखी या स्वरुपाची लक्षणे दिसून येतात. या रुग्णांमध्ये लक्षणांची तीव्रता अधिक नाही. हवामानबदलामुळे आरोग्याशी निगडित या तक्रारी उद्भवतात. हे रुग्ण बरे होण्याचा दरही चांगला आहे. लाभार्थ्यांमध्ये दोन्ही मात्रा घेतलेल्यांची अधिक संख्या, सामुहिक प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यामुळे करोना संसर्गाची लागण होण्याचा वेग कमी झाला आहे.











