‘बाटला हाऊस’ जबरदस्त वास्तववादी थरारनाट्य

मुंबई: बाटला हाऊस हा २००८ मध्ये झालेल्या एका वादग्रस्त एन्काऊंटरवर आधारित आहे. हा वाद खूप गाजला होता आणि अद्यापही त्याबाबतीत विविध मते प्रचलित आहेत. वास्तववादी घटनेवर आधारित चित्रपटांचे चित्रपट रूपांतर हा अलीकडच्या काळात लोकप्रिय होत चाललेला एक नवा जोनर आहे आणि त्यात ‘बाटला हाऊस’ हे अजून एक उत्तम उदाहरण म्हणून जमा होत आहे.

दिल्लीच्या बाटला हाऊस येथे काही विद्यार्थ्यांवर पोलिसांनी दहशतवादी असल्याचा संशय घेऊन कारवाई केली. त्यात एक पोलिस अधिकारी मारला गेला आणि तरीही या एकूण प्रकरणाबद्दल मीडिया, राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था, मानवी हक्क आयोग, न्यायालय आणि खुद्द पोलिस दलातूनही सगळ्या बाजूने विविध प्रकारचे दबाव निर्माण झाले. त्यापैकी, फक्त ‘हे विद्यार्थी निरपराध होते की दहशतवादी? त्यांना बळीचा बकरा बनविण्यात आले की ही चकमक खरी आहे?’ या एकाच धाग्याभोवती हे नाट्य रचले आहे. या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या, सहा वेळा पोलिस पदक मिळवलेल्या पोलिस अधिकारी संजय कुमार यांच्या दृष्टिकोनातून हे नाट्य मांडण्यात आले आहे.

दिल्लीत पाच ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्यानंतर काही दहशतवादी बाटला हाउस मध्ये राहात असल्याच्या संशयावरून दिल्ली पोलिसांनी कारवाई केली; त्यात मोहीम प्रमुख पोलिस अधिकाऱ्याचाच मृत्यू झाल्याने या प्रकरणाला पोलिसांतील अंतर्गत संघर्ष आणि हे सगळे विद्यार्थी निरपराध आहेत असा सूर निघू लागला. पोलिसांना बॉम्बस्फोट प्रकरणात यश न मिळाल्याने त्यांनी खोटे आरोपी निर्माण केले; यासाठी या विद्यार्थ्यांचा वापर केला असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला. त्याबद्दल चौकशीही सुरू झाली आणि पाच वर्षांनंतर या प्रकरणांचा निकाल लागला. निकाल लागला असं म्हणणं खरेतर चूक आहे, कारण अजूनही या बाबतीत विविध दृष्टिकोन आहेत आणि जनमानसात चर्चा सुरू आहे.

हे नाट्य परिणामकारकपणे मनाचा ठाव घेणारे ठरते. अशा प्रकरणी पोलिस हे व्हिलन असतात, हे आतापर्यंत दाखवण्याचा प्रघात राहिलेला आहे, त्याला अपवाद ठरवून पोलिसांच्या बाजूने विचार करायला लावणारे हे नाट्य विशेष वाटते.

यामध्ये मुख्य भूमिका करणाऱ्या अभिनेता जॉन अब्राहमने भूमिकेला उत्तम न्याय दिलेला आहे. तो एक चांगल्या प्रतीचा अभिनेता आहे हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. त्याच्या पत्नीच्या भूमिकेतील मृणाल ठाकूर उठून दिसली आहे. त्या तुलनेत बाकीची पात्रे काहीशी कमकुवत वाटतात. शेवटच्या कोर्टरूम ड्रामामधील सगळेच लोक फिके वाटतात. तरीही यामध्ये सगळ्या पात्रांना पुरेसे आणि आवश्यक तेवढे वेटेज दिल्यामुळे सगळे आपापल्या जागी योग्य वाटतात.

वास्तव माहितीचा उत्तम वापर, पुरेसे सखोल संशोधन, पटकथा तंत्राच्या व्यवस्थित वापरासह केलेले उत्तम लेखन ही जशी या चित्रपटची जमेची बाजू आहे, तशीच त्याचे यथायोग्य प्रोडक्शन डिझाईनपासून संगीत – नृत्यापर्यंत (नोरा फतेहीचे ‘ओ साकी साकी रे’ बघायलाच हवे) सगळ्या तांत्रिक विभागानेही उत्तमरित्या काम बजावले आहे.