उद्या भारत बंद, देशव्यापी कामगार संप

नवी दिल्ली: नागरिकविरोधी’ धोरणांच्या निषेधार्थ देशातील २५ कोटी कामगार उद्या, बुधवारी होणाऱ्या देशव्यापी संपात सहभागी होणार असल्याची माहिती दहा केंद्रीय कामगार संघटनांनी सोमवारी दिली. आयएनटीयूसी, एआयटीयूसी, एचएमएच, सीआयटीयू, एआययूटीसी, टीयूसीसी, एसईडब्लूए, एआयसीसीटीयू, एलपीएफ, यूटीयूसी यांच्यासह अनेक कामगार संघटना या संपात सहभागी होतील. अंदाजे २५ कोटी कामगार संपात सहभागी होतील, असा दावा या संघटनांनी सांगितले आहे.

कामगारविरोधी धोरणांमुळे १२ विमानतळे खासगीकरणाच्या हेतूने विकण्यात आली आहेत. एअर इंडियाचीही १०० टक्के विक्री ठरलेली आहे. बीपीसीएल विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे. बीएसएनएल-एमटीएनएल विलिनीकरणाची घोषणा झाली आहे. ९३,६०० दूरसंचार कामगारांना व्हीआरएसच्या (ऐच्छिक सेवानिवृत्ती योजना) बाहेर काढण्यात आले आहे. रेल्वेचे खासगीकरण, ४९ संरक्षण उत्पादनांचे कॉर्पोरेटायझेशन आणि बँकांचे विलीनीकरण करण्याच्या विरोधातही या कामगार संघटना आहेत, असे कामगार संघटनांनी निवेदनात नमूद केले आहे.

फीवाढीची रचना आणि शिक्षणाच्या व्यापारीकरणाविरोधात आवाज उठविण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांच्या सुमारे ६० संघटना आणि काही विद्यापीठांचे निवडून आलेले पदाधिकारीही संपात सहभागी होणार आहेत. १७५हून अधिक शेतकरी आणि कृषी कामगार संघटनांदेखील कामगारांच्या मागण्यांना पाठिंबा देणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.