CAA ला घाबरण्याची गरज नाही – CM उद्धव ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत भेटीनंतर मोठे वक्तव्य

नवी दिल्ली : CAA, NRC च्या विषयावर पंतप्रधानांशी चर्चा झाली असून CAA हा कायदा नागरिकत्व देण्याचा कायदा आहे. या कायद्याला घाबरण्याचं काहीही कारण नाही, असे प्रतिपादन  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेऊन चर्चा केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, राज्याला सहकार्य करण्याचं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं आहे. महाराष्ट्राला दिल्लीच्या सहकार्याची गरज आहे. पंतप्रधानांच्या भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाली असल्याचे देखील ते म्हणाले.

दरम्यान उद्धव ठाकरेंनी सीएए आणि एनआरसीवर भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता महाविकास आघाडीतील   काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा तिन्ही कायद्यांना तीव्र विरोध आहे. 

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, पंतप्रधानांच्या भेटीत सीएए एनआरसीवर चर्चा झाली. या विषयी सामनाच्या माध्यमातून मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. सीएएला घाबरण्याची गोष्ट नाही. एनआरसीवर संसदेत भूमिका स्पष्ट केली आहे. ते फक्त आसाम पुरतं मर्यादित आहे, असंही ठाकरे म्हणाले.  एनआरसी हा फक्त आसाममध्येच लागू होणार असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी मोदींशी केलेल्या चर्चेनंतर दिली आहे. तर एनपीआर हा जनगणनेचा भाग असल्यानं त्याला विरोध नसल्याचंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.

ठाकरे म्हणाले की, या भेटीत राज्याच्या विकासावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली. महाराष्ट्रातल्या इतरही प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली असंही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच दिल्लीत आलो आहोत. राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये कोणताही वाद नाही असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. राज्यपाल आणि सरकारमध्ये देखील वाद नाही, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.