
मुंबई – महाराष्ट्रात आज कोरोनाचे नवीन ३५० रुग्ण सापडल्याने राज्यातील एकूण रुग्ण संख्या २ हजार ६८४ झाली आहे. राज्यात आज १८ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित मृतांचा एकूण संख्या १७८ झाली आहे.
राज्यातील एकूण २५९ करोनाबाधित रुग्ण आजपर्यंत बरे होऊन घरी गेले आहेत.
राज्यात आज १८ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात मुंबईचे ११, पुण्यातील चार तर अहमदनगर आणि औरंगाबाद मनपा येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. एक मृत्यू राज्याबाहेरील नागरिकाचा आहे.
आज झालेल्या मृत्यूंपैकी ११ पुरुष तर ७ महिला आहेत. आज झालेल्या १८ मृत्यूपैकी ५ जण हे ६० वर्षांवरील आहेत ११ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. तर दोघेजण ४० वर्षाखालील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या १८ जणांपैकी १३ रुग्णांमध्ये ( ७२ %) मधुमेह. उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. या रुग्णांपैकी एकाला कॅन्सर तर एकाला क्षयरोग होता.कोविड 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूची संख्या आता १७८ झाली आहे.
प्रयोगशाळा तपासण्या
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४६,५८८ नमुन्यांपैकी ४२,८०८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २,६८४ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात आज एकूण ५०५९ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी १८.३७ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
इतर महत्वाचे मुद्दे
आजपर्यंत राज्यातून कोविड 19च्या २५९ रुग्णांना ते बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ६७,७०१ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ५,६४७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
तबलीगी जमातशी संबंधित ५० कोरोनाबाधित
निजामुद्दीन येथील बंगलेबाली मशीदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. यातील ७५५ रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली असून राज्यात या व्यक्तींपैकी ५० जण करोनाबाधित आढळले आहेत. यापैकी लातूरमध्ये आठ, यवतमाळ येथे सात, बुलढाणा जिल्ह्यात सहा, मुंबईत १४ तर प्रत्येकी २ जण पुणे .पिपरी चिंचवड, नागपूर मनपा आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण रत्नागिरी, नागपूर हिंगोली, जळगाव, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि वाशीम मधील आहेत. याशिवाय या व्यक्तींच्या निकट संपर्कातील सहाजण अहमदनगर येथे तर एकजण पिपरी-चिंचवड येथे करोनाबाधित आढळले आहेत.






