
मुंबई – राज्यात आज २३३ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या २९१६ झाली आहे. आज राज्यात ९ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे २, पुण्यातील ६ तर अकोला मनपा येथील 1 रुग्ण आहे. कोविड 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूची संख्या आता १८७ झाली आहे.
मृत्यू झालेल्याची अधिकची माहिती –
आज झालेल्या मृत्यूंपैकी ६ पुरुष तर ३ महिला आहेत. आज झालेल्या ९ मृत्यूपैकी ४ जण हे ६० वर्षांवरील आहेत ३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. तर दोघेजण ४० वर्षाखालील आहेत.मृत्यूमुखी पडलेल्या ९ जणांपैकी ६ रुग्णांमध्ये ( ६७ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
प्रयोगशाळा तपासण्या –
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५२,००० नमुन्यांपैकी ४८,१९८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २९१६ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
क्लस्टर कंटेनमेंट कृतीयोजना –
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात आज एकूण ५३९४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी २० लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद शहरात जो मृत्यू झाला त्या अरेफ कॉलनी भागात तसेच या रुग्णाचे निकटसहवासित करोना बाधित आढळलेल्या जलाल नगर भागातही क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना राबविण्यात येते आहे. या क्षेत्रातील सुमारे पाच हजार लोकसंख्येचे नियमित घरोघर सर्वेक्षण करण्यात येत आहे. औरंगबाद शहरात एकूण ११ कटेनमेंट झोन असून १०३ सर्वेक्षण पथके तिथे २८ हजाराहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण करत आहेत.
इतर महत्वाचे मुद्दे –
१. आजपर्यंत राज्यातून २९५ कोविड १९ रुग्णांना ते बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.
२. सध्या राज्यात ६९,७३८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ५,६१७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.






