
? ठाणे रेल्वे स्थानकात रुळांवर पावसाचे पाणी
ठाणे – मुंबई आणि उपनागर परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामध्ये मार्च महिन्यापासून राज्यात, देशात लॉक डाऊन पुकारण्यात येत असल्याने रेल्वेच्या वतीने पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारे नाल्यांची सफाईच पूर्ण झाली नसल्याने ठाणे स्थानक येथे रूळ पावसाच्या पाण्याखाली शनिवारी गेले. पण संथ गतीने अत्यावश्यक लोकल वाहतूक सुरू असल्याने अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकल नियमित वेळेच्या उशिरा मिळाली. यामुळे घरी परण्याच्या वेळी प्रवाशांचे हाल झाले.
अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या प्रवाशांमध्ये सुमारे ७० हजार कर्मचारी लोकलने प्रवास करत आहेत. तसेच सकाळच्या वेळी इतर प्रवासी देखील लोकल प्रवास करताना आढळत आहेत.
दरवर्षी रेल्वेच्या वतिने रुळांच्या बाजूचे नाले साफ करण्यात येतात. पण यावर्षी कोरोनामुळे लॉक डाऊन पुकारण्यात आल्याने रेल्वेच्या ठेकेदारांनी कामगार कमी प्रमाणात मिळत असल्याने नाले सफाई दिखाऊ साफसफाई केल्याने ठाणे रेल्वे स्थानक परिसरात पावसाचे पाणी तुंबल्याने रूळ पाण्याखाली गेले होते.
यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने तब्बल वीस मिनिटे अत्यावश्यक सेवेकरिता सुरू असलेली लोकल उशिरा धावत होती. यामुळे संध्याकाळी घरी परतण्याच्या वेळी लोकल प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.






