संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची आदरांजली

मुंबई – महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिनानिमित्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हुतात्मा चौक येथील हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी गृह मंत्री अनिल देशमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्य मंत्री अदिती तटकरे, पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, मुख्य सचिव संजय कुमार, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी मराठी जनतेने सर्वस्व पणाला लावून लढा दिला. या लढ्यात १०७ हुतात्म्यांनी आपले प्राणार्पण केले. संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी २१ नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन म्हणून पाळला जातो.