Anna is back: शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत तर उपोषणाला बसणार; अण्णांचा मोदी सरकारला इशारा

शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत तर पुन्हा उपोषणाला बसेन, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोदी (PM Narendra Modi) सरकारला दिला. यासंदर्भात अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांना पत्र लिहिले आहे. पत्रात अण्णा म्हणतात – शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत तर मी उपोषणाला बसणार आहे. काही दिवसांपूर्वीच दिल्लीत सुरु असलेले हे आंदोलन देशव्यापी झाले पाहिजे असे ते म्हणाले होते.

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा, फळं, भाजीपाला, दूध यांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) लागू करा, शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करा, आयात-निर्यातीबाबत धोरण ठरवा या मागण्याही पत्रात केल्या आहेत. केंद्राने केलेले कृषी कायदे रद्द करा, या मागणीसाठी १६ दिवसांपेक्षा जास्त काळ पंजाब आणि हरयाणामधल्या शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. दिल्ली-हरयाणाच्या सीमेवर (सिंघू बॉर्डरवर) हे आंदोलन सुरू आहे. शेतकरी आणि सरकार यांच्यातल्या चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. तरीही सरकारने शेतकऱ्यांसाठी चर्चेचे दरवाजे बंद केले नाहीत. केंद्र सरकारने कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची तयारी दर्शवली आहे.