
युक्रेनमध्ये (Ukraine) अनेक भारतीय अडकले आहेत. रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia-Ukraine War) पार्श्वभूमीवर भारतीय दुतावासाने या नागरिकांना सूचना दिल्या आहेत. काही ही करा पण खारकीव (Kharkiv) सोडा. होऊ शकते की तुम्हाला कदाचित वाहन मिळू शकणार नाही. पण, साधनांची वाट न पाहता वेळ पडल्यास पायी चालत निघा पण खारकीव शहरातून बाहेर पडा. युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर गोळीबार आणि बॉम्बवर्षाव सुरु आहे. त्यामुळे भारतीय दुतावासाने ‘इंडिया इन युक्रेन’ (India in Ukraine) ट्विटर हँडलवरुन ट्विट केले आहे की, ‘एक महत्त्वपूर्ण सूचना.. आपल्या सुरक्षेसाठी शक्य तितक्या लवकर खारकीव सोडा. शक्य तितक्या लवकर पोसोचिन, बाबाये आणि बेजलियुडोवकाच्या दिशेने निघा.

आणखी एका सूचनेत भारतीय दुतावासाने म्हटले आहे की, युक्रेनमध्ये असलेल्या ज्या विद्यार्थी, नागरिकांना निश्चित ठिकाणी परतण्यासाठी रेल्वे, वाहन अथवा इतर साधने मिळणार नाहीत त्या विद्यार्थ्यांनी पायी चालत पेसोचिन (11 किमी), बाबाये (12 किमी) आणि बेजलियुडोवका (16 किमी) या ठिकाणांच्या दिशेने पोहोचायचे आहे. युक्रेनियन प्रमाण वेळेनुसार सायंकाळी 6 वाजता इथपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. या परिसरात सार्वजनिक वाहतुकीच्या मोठ्याच समस्या आहेत. दरम्यानच्या काळात भारत सरकारने या सूचना जारी केल्या आहेत.

खारकीवमध्ये रशियन सैन्याने मोठ्या प्रमाणावर गोळीबार आणि बॉम्ब वर्षाव सुरु केला आहे. या हल्ल्यात नवीन शेखरप्पा नामक एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. युक्रेनमध्ये खारकीव रेल्वे स्ठेशनवर उपस्थित असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी दावा केला आह की, त्याला ट्रेनमधून खाली उतरवले होते. या विद्यार्थ्यांचे म्हणने असे की, ट्रेन स्टेशनवर आली आणि निघूनही गेली. मात्र, त्यांना ट्रेनमध्ये चढूच दिले गेले नाही. खारकीव येथे रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर बर्फवर्षाव होतो आहे. त्यामुळे उघड्यावर असलेले भारतीय नागरिक, विद्यार्थी आणि उपस्थित नागरिक थंडीने कुडकुडत आहेत.






