
सोमवारी (28 नोव्हेंबर) विजय हजारे ट्रॉफी 2022 मध्ये उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळले गेले. अहमदाबाद येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशचा 58 धावांनी पराभव करत उपांत्य फेरी गाठली. या सामन्यात नाबाद द्विशतकी खेळी करणारा महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड सामनावीर ठरला. ऋतुराजने याच सामन्यात एका षटकात 7 षटकार ठोकण्याची विश्वविक्रमी कामगिरी केली. त्यानंतर प्रतिक्रिया देताना त्याने आपले शतक संघसहकारी, कुटुंब व सबंध महाराष्ट्राला अर्पण केल्याचे म्हटले.
महाराष्ट्र संघाचा कर्णधार असलेल्या ऋतुराज गायकवाड याने या सामन्यात 138.36च्या स्ट्राईक रेटने धावा फटकावल्या. त्याने 159 चेंडूत नाबाद 220 धावा केल्या. यामध्ये 10 चौकार आणि 16 षटकांराचा समावेश होता. त्याने डावाच्या 49 व्या षटकात शिवा सिंग याला सात षटकार मारत विश्वविक्रमही रचला. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये एका षटकात सात षटकार ठोकणारा तो पहिला फलंदाज बनला.
भारतीय संघातून बाहेर असलेला ऋतुराज या संपूर्ण स्पर्धेत शानदार फॉर्ममध्ये दिसून आला आहे. त्याने स्पर्धेत केवळ 3 सामने खेळताना एक शतक व एक द्विशतक झळकावत 384 धावा चोपल्या आहेत. त्याचवेळी या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास ऋतुराजच्या द्विशतकाच्या जोरावर महाराष्ट्र संघाने उत्तर प्रदेशसमोर 331 धावांचे आव्हान ठेवलेले. या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या उत्तर प्रदेशचे युवा अष्टपैलू राजवर्धन हंगारगेकर याने पाच बळी घेत कंबरडे मोडले. परिणामी, महाराष्ट्राने 58 धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली.
आपल्या खेळीबद्दल बोलताना तो म्हणाला,“ मी माझे हे द्विशतक माझ्या संघ सहकाऱ्यांना, नेहमीच मला पाठिंबा देणाऱ्या माझ्या कुटुंबाला आणि संपूर्ण महाराष्ट्राला अर्पण करत आहे.”










