
नवी दिल्ली: वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू, गांधी यांच्याप्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा. इथे तडजोड नाही. आम्ही पंडित नेहरू, महात्मा गांधी यांना मानतो तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे’ असे ट्विट करत राऊत यांनी राहुल गांधी यांना खडेबोल सुनावले आहेत.
काँग्रेसने दिल्लीतील रामलीला मैदानावर ‘भारत बचाव’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करताना राहुल यांनी अत्यंत आक्रमकपणे सरकारवर हल्ला चढवला. देशातील बलात्काराच्या वाढत्या घटनांवरून सरकारवर टीका करताना राहुल यांनी एका सभेत ‘मेक इन इंडिया’चा प्रवास ‘रेप इन इंडिया’च्या दिशेनं सुरू असल्याचं म्हटलं होतं. त्यावरून संसद अधिवेशनात भाजपच्या खासदारांनी राहुल यांना घेरलं होतं. राहुल गांधी यांनी देशातील महिलांचा अपमान केला आहे. त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या खासदारांनी केली होती. त्यावर बोलताना राहुल यांनी सावरकरांचा उल्लेख करत पलटवार केला. ‘मी काहीही चुकीचं बोललो नव्हतो. जे सत्य आहे, तेच बोललो होतो. त्यामुळं माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काँग्रेसचा कुठलाही कार्यकर्ता घाबरत नाही. काँग्रेसवाले ‘बब्बर शेर’ आहेत. देशासाठी जीव द्यायलाही आम्ही तयार आहोत. कोणाच्या दबावाखाली येऊन माफी मागायला मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे, असे राहुल गांधी म्हणाले. यावर शिवसेनेने तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे.






