
पुणे: राज्याचे माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या डिग्रीवर डॉ.अभिषेक हरिदास यांनी आक्षेप घेत संशय व्यक्त केला होता. त्यानंतर आज पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अनेक आजी माजी नेत्यांची नावे घेत त्यांच्या शैक्षणिक डिग्री बोगस असल्याचा दावा केला आहे. शिवसेना नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय रविंद्र सामंत यांची पदवी बोगस विद्यापीठाची आहे असा आरोप यावेळी त्यांनी केला आहे.
अभिषेक हरिदास म्हणाले, मंत्री उदय रवींद्र सामंत यांनी इलेक्शन कमिशन २०१९ च्या अॅफिडेव्हिटनुसार डिप्लोमा ऑटोमोबाइल हे ज्ञानेश्वर विद्यापीठातून झाले आहे. या पूर्वी भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांची पदवीही संत ज्ञानेश्वर विद्यापीठातली होती. तसेच शिवसेनेचे मनोहर जोशी हे ज्ञानेश्वर विद्यापीठाचे कुलपती होते. ज्ञानेश्वर विद्यापीठ हे बोगस विद्यापीठ आहे कारण त्याची स्थापना ही ना राज्य सरकारने केली ना केंद्र सरकारने असंही हरिदास यांनी म्हटलं आहे.






