
मुंबई: अनेक महिन्यांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर रविवारी पार पडला. राज्यपाल भवनामध्ये 13 नव्या मंत्र्यांना राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडून शपथ देण्यात आली. या मंत्रिमंडळ विस्तारात विदर्भाला सर्वाधिक 5 मंत्रिपदे मिळाली असून त्याखालोखाल मुंबईला 3 मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.
विदर्भातून संजय कुटे, डॉ. अनिल बोंडे, परिणय फुके, तानाजी सावंत, अशोक उईके यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. तर मुंबईतून भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार योगेश सागर, आरपीआयकडून अविनाश महातेकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
मराठवाड्यातून अतुल सावे, नुकताच राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातून माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिपद देण्यात आलेलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातून पुणे ग्रामीण भाजपा अध्यक्ष बाळा भेगडे, सांगलीतील भाजपा आमदार सुरेश खाडे यांना मंत्रिपद देण्यात आले आहे.
विदर्भातील एकट्या यवतमाळ जिल्ह्यात आता चार मंत्री झाले. पहिल्यांदाच 4 मंत्री एका जिल्ह्याला मिळाले आहेत. संजय राठोड महसूल राज्यमंत्री शिवसेनेचे, मदन येरावर, ऊर्जा राज्यमंत्री भाजपचे, डॉ.प्राचार्य अशोक उईके(आमदार भाजप, राळेगाव) डॉ. तानाजी सावंत(विधान परिषद सदस्य, शिवसेना यवतमाळ) हे मंत्री झालेले आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक आहेत. अशातच विरोधी पक्षनेते राहिलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसशी फारकत घेत भाजपाशी जवळीक साधली. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमध्ये नाराज झाले. डॉ. सुजय विखेंना तिकीट मिळावं यासाठी राधाकृष्ण विखे पाटील प्रयत्न करत होते मात्र तिकीट न मिळाल्याने डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश करत अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी पदरात पाडली. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुजय विखेंच्या गळ्यात विजयाची माळ पडल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनीही आमदारकीचा राजीनामा दिला. विखे पाटील यांनी अधिकृतरित्या भाजपात प्रवेश केला नसला तरी आज मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागली आहे.






