
महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) सध्या वाढत असलेला कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग चिंतेची बाबा ठरत आहे. जवळजवळ 7 महिन्यानंतर पुन्हा एकदा राज्यात कोरोनाने जोर पकडला आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूच्या तब्बल 40,414 घटनांची नोंद झाली आहे. आज राज्यात 17,874 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला असून 108 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह एकूण प्रकरणांची संख्या 2,71,3875 झाली आहे. आतापर्यंत एकूण डिस्चार्ज मिळालेय रुग्णांची संख्या 2,33,2453 झाली आहे. सध्या राज्यात सक्रिय 3,25,901 रुग्णांवर उपचार सुरु असून, आतापर्यंत 54,181 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
अशाप्रकारे आज महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणू रुग्णसंख्येने 40 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. दुसरीकडे महाराष्ट्राची राजधानी मुंबईची परिस्थिती काही वेगळी नाही. मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 6923 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह एकूण संक्रमितांची संख्या 3,98,674 वर पोहोचली आहे. आज शहरात 3,380 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण 3,40,935 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या शहरात 45,140 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज शहरात 8 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 11,649 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, आज कोरोना बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत टास्क फोर्सची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये लॉक डाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या. टास्क फोर्स डॉक्टर्स व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर, येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवावा यावर चर्चा केली.











