
सीबीएसई बोर्डाच्या पावलावर पाऊल ठेवत राज्याच्या शालेय शिक्षण विभागानेही बारावीसाठी 30ः30ः40 चा फॉर्म्युला शुक्रवारी जाहीर केला. देशपातळीवर बारावीच्या निकालात एकसूत्रता व समानता यावी यासाठी एकच मूल्यमापन प्रक्रिया असावी, असे मत यापूर्वीच राज्य सरकारने मांडले होते. त्यानुसार सीबीएसईप्रमाणे राज्य शिक्षण मंडळही दहावी, अकरावी व बारावीच्या परीक्षांचे मिळून अनुक्रमे 30ः30ः40 पैकी गुणांमध्ये रूपांतर करून बारावीचा निकाल जाहीर करणार आहे.
शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या मूल्यमापन पद्धतीनुसार बारावीचा निकाल लावताना दहावी, अकरावी आणि बारावी या तीनही वर्षांतील कामगिरी लक्षात घेतली जाणार आहे. यामध्ये तीनही वर्षांमध्ये झालेल्या परीक्षा, अंतर्गत मूल्यमापनाचा विचार केला जाणार असून बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय गुण लक्षात घेतले जाणार आहेत.
बारावीसाठी जाहीर झालेल्या निकालपद्धतीने विद्यार्थ्यांचे समाधान न झाल्यास कोरोनाची स्थिती सामान्य झाल्यावर बोर्डाकडून आयोजित केल्या जाणाऱया लगतच्या परीक्षांमध्ये श्रेणीसुधार योजनेअंतर्गत लागू होणाऱया एक किंवा दोन परीक्षेच्या संधी उपलब्ध असतील.
श्रेणी विषयाचे गुण देताना मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करून प्रदान केले जाणार आहे शिवाय पुनरपरीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी दहावीच्या वर्गातील सरासरी गुणांवरून बारावीच्या लेखी परीक्षेसाठी विषयनिहाय निश्चित केलेल्या इयत्ता दहावीच्या भारांशनुसार गुण प्रदान केले जाणार आहेत.
अन्य बोर्डाची दहावीची परीक्षा उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांचे दहावीतील सर्वोत्तम गुण मिळालेल्या 3 विषयांचे सरासरी गुण (100पैकी) काढण्यात येणार आहेत.
अपवादात्मक परिस्थितीत तोंडी/ प्रात्यक्षिक परीक्षा/ अंतर्गत मूल्यमापन केले नसल्यास नेहमीच्या किंवा अन्य पर्यायी पद्धतीचा वापर करून ऑनलाइन किंवा अन्य पर्यायी पद्धतीने मूल्यमापन पूर्ण करून गुण द्यावेत.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यार्थ्याला विषयनिहाय मिळालेले गुण तसेच सदर गुण कितीपैकी आहेत इत्यादी तपशील संगणकप्रणालीत भरण्याची सुविधा कॉलेजना उपलब्ध असेल.
कॉलेजस्तरावर एक परीक्षा समितीची स्थापना करून मूल्यमापन करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. यासाठी मुख्याध्यापक व प्राचार्यांनी सर्व प्रकारचे अभिलेख व माहिती जतन करून ठेवावी. निकालपत्र तयार करत असताना कोणत्याही प्रकारची खोटी व दिशाभूल करणारी माहिती दिल्यास संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. – शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड,






