
गेल्या वर्षी देशात लागू करण्यात आलेले तीन कृषि कायदे मागे घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे होते, पण तरी ते आम्ही त्यांना समजवू शकलो नाही, ही आमचीच चूक आहे, असं मोदी म्हणाले.
शेतकऱ्यांच्या हितासाठीच तीन कृषि कायदे देशात आणले होते. छोट्या शेतकऱ्यांना फायदा मिळावा यासाठीच हा प्रयत्न होता. गेल्या कित्येक दिवसांपासून यासंदर्भात मागणी होती. अनेक संघटनांची ती मागणी होती.
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी देशाच्या हिताच्या दृष्टीने हे कायदे असले तरी काही शेतकऱ्यांना आम्ही ते समजवू शकलो नाही.
आम्ही खुल्या अंतःकरणाने शेतकऱ्यांना समजावत राहिलो. सातत्याने चर्चा होत राहिली. पण आमच्याच प्रयत्नात काही कसर राहिली, त्यामुळे आम्ही आमचं म्हणणं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू शकलो नाही.
कायदे मागे घेतल्यानंतर सिंघु बॉर्डरवर आंदोलनस्थळी मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला.
आंदोलनास बसलेल्या शेतकऱ्यांनी आता घरी निघून जावं. आता आपण पुन्हा नवी सुरुवात करू, असं मोदी म्हणाले.






