
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील अभिनेते किरण माने (Actor Kiran Mane) यांना मालिकेतून काढून टाकण्यात आले आहे. ते केंद्र सरकारच्या विरोधात बोलले म्हणून त्यांना काढल्याचा आरोप होत आहे. दरम्यान आता यावरून आरोप प्रत्यारोपाचे राजकारण रंगताना दिसत आहे.
किरण माने हे आपल्या सोशल मीडियावरील परखड मतप्रदर्शनामुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र, आता त्यांना राजकीय भाष्य नडल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपाला उत आल्याचे पहायला मिळत आहे. किरण माने यांच्या प्रकरणावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.






