नाणार मध्ये रिफायनरी प्रकल्प झाला पाहिजे – मुख्यमंत्री

राजापूर (कोकण) : भाजपा आणि शिवसेना यांची पुन्हा एकदा जुंपणार असे चिन्हे दिसत आहे. आज महाजनादेश यात्रेला संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्पाचे जोरदार समर्थन केले तसेच सरकार याबाबत पुनर्विचार करणार असल्याचे संकेत दिले.

या प्रकल्पामुळे १ लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. राजापूर येथे महाजनादेश यात्रेला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. नाणारमध्येच रिफायनरी झाली पाहिजे, हे मी घसा फोडून सांगत होतो. हा ग्रीन रिफायनरी प्रकल्प आहे. मात्र ज्याप्रकारे या प्रकल्पाला विरोध झाला त्यामुळे हा निर्णय थांबवण्यात आला होता. पण इथे आल्यावर तुमचा उत्साह पाहिल्यानंतर या प्रकल्पाची पुन्हा एकदा चर्चा करावी असं मला वाटतंय, असं फडणवीस यांनी सांगितलं. या प्रकल्पामुळे कोकणातील १ लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे, असं सांगतनाच आज या प्रकल्पाबात कोणताही निर्णय जाहीर करत नसलो तरी या संदर्भात तुम्हाला पुन्हा एकदा भेटणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

या प्रकल्पावरून पुन्हा एकदा शिवसेना-भाजपमध्ये जुंपण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनीही या प्रकल्पाला विरोध केला होता, त्यामुळे ते याबाबत काय भूमिका घेतात याकडेही सर्वांचं लक्ष लागले आहे.