
दिवा-शीळ विभागातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने रहिवासी हैराण….
ट्विटर द्वारे सुध्दा लक्ष वेधले….
दिवा : कल्याण ग्रामीण मतदारसंघातील दिवा-शीळ विभागात टोरंट कंपनी मार्फत वीज पुरवठा व नियोजन सुरु आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून दिवा-शीळ विभागातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. 24-24 तास वीज खंडित होत असल्याने रहिवासी हवालदिल झाले आहेत.याची आमदार राजू पाटील यांनी त्वरित करून ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे आणि ट्विटर द्वारे सुध्दा लक्ष वेधले आहे.

मनसे आमदार यांनी आपल्या पत्रात म्हंटले आहे की राज्यात कोरोना व्हायरसचे थैमान सुरू आहे. दिवा विभागातही एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आधीच भीतीने वातावरण आहे. त्यातच राज्यात शटडाऊन असल्याने सर्वजण घरी आहेत त्यामुळे अत्यावशक सेवा असलेला वीज पुरवठा सुरळीत असावा अशी सर्वांची अपेक्षा होती परंतु टोरंट कंपनीचा भोंगळ कारभार सुरू असून वीज पुरवठ्यामध्ये बिघाड होऊन 12-12 तास होऊनही टोरंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तांत्रिक बिघाड सापडत नाही हे दुर्दैवी आहे.जर रहिवासी रस्त्यावर उतरल्यास शटडाऊनला कोणताही अर्थ उरणार नाही. वास्तविक दिव्यातील नागरिकांचा टोरंट कंपनीला कडाडून विरोध होता. त्यासाठी अनेक विधायक मार्गानी टोरंट दिवा-शीळ विभागात आणू नये म्हणून सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला व सर्वच स्तरावर पत्रव्यवहार करून मी विरोध दर्शविलेला आहे. तरीही शासनाने जबरदस्तीने ही कंपनी लादली आहे आणि त्याचे परिणाम आज सर्वसामान्य नागरिकांना भोगावे लागत आहेत. टोरंट पेक्षा महावितरण चा कारभार चांगला होता अशी भावना आज जनतेमध्ये आहे. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारंवार वीज खंडित होत असल्याने त्रस्त जनतेने रस्त्यावर उतरून आंदोलन केल्यास शट डाऊनचा काहीही उपयोग होणार नाही.
तरी कृपया आपण तातडीने लक्ष घालून दिवा -शीळ विभागातील टोरंट कंपनीच्या हातातील कारभार ताबडतोब काढून पुन्हा महावितरण कडे देण्यात यावा, सतत होणाऱ्या विजेच्या खेळ खंडोबा मुळे रहिवासी रस्त्यावर उतरल्यास शटडाऊनला कोणताही अर्थ उरणार नाही व याची सर्वस्वी जबाबदारी ऊर्जा विभाग व टोरंट कंपनी प्रशासनावर राहील याची दखल घ्यावी.आता याची दखल घेतली जाते का हे पाहावे लागेल.











