
चौथ्या लॉक डाऊन चे दिले संकेत, 17 मे नंतर लॉक डाऊन वाढविण्याची घोषणा
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाशी लढण्यासाठी २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधत आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केली. यासाठी मोदींनी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. हे पॅकेज जीडीपीच्या १० टक्के असल्याचे त्यांनी सांगितले.
करोनाच्या पार्श्वभुमीवर जाहीर लॉकडाउनचा तिसरा टप्पा १७ मे रोजी संपत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन पुढे वाढवला जाणार असल्याची घोषणा केली.
दरम्यान त्यांनी जगात ४२ लाखांपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले असून पावणे तीन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एका व्हायरसने संपूर्ण जगाचं नुकसान केलं आहे. असं संकट ना कधी पाहिलं ना ऐकलं आहे. हे संकट खूप मोठं संकट असल्याचे म्हटले.
आर्थिक पॅकेज सर्व प्रकारच्या उद्योगांना चालना देण्यासाठी असून अर्थमंत्री यांच्याकडून आत्मनिर्भर भारत अभियानाची विस्तृत माहिती दिली जाईल असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं आहे.
मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे
● एका व्हायरसने संपूर्ण जगाला संकटात टाकलं आहे. मात्र कोरोनाला हरवण्यासाठीचा आपला निश्चिय अतिशय दृढ करायचा असून कोरोनाला हरवायचं आहे. मानवाला पराभव मान्य नाही. सतर्क राहून, सर्व नियमांचं पालन करत आपल्याला कोरोनापासून वाचायचं आहे आणि पुढे जायचं आहे.
● स्वावलंबी भारत उभारण्याची गरज आहे.
● भारताला आत्मनिर्भर बनवायचं आहे.
● कोरोनापूर्वी भारतात पीपीई किट तयार होत नव्हते. मात्र आता आपण पीपीई किट बनवण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचं हे संकट भारतात नवी संधी घेऊन आलं आहे. भारतात आता दररोज 2 लाख पीपीई किट तयार करण्यात येत आहेत. दररोज 2 लाख एन-95 मास्कचं उत्पादन होत आहे.
● जीवन-मरणाच्या लढाईत जगात आज भारतातील औषधं नवा आशेचा किरण घेऊन आली आहेत. जगभरात भारताची प्रशंसा होत असून प्रत्येक भारतीयासाठी ही गर्वाची गोष्ट आहे.
● आपल्याकडे साधनं आहेत. सामर्थ्य आहे, आपल्याकडे जगातील सर्वात उत्तम टॅलेन्ट आहे. आपण उत्तम उत्पादनं तयार करु. आपली गुणवत्ता अधिक उत्तम करुन सप्लाय चेन आधुनिक करुया. हे आपण करु शकतो आणि करु.
● कोरोना विषाणूशी लढण्यासाठी भारताला 20 लाख कोटींचं विशेष आर्थिक पॅकेज जाहीर. आर्थिक पॅकेज भारताच्या जीडीपीच्या 10 टक्के असणार आहे. 2020 साली 20 लाख कोटी रुपये आत्मनिर्भर भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी गती देईल.
● हे आर्थिक पॅकेज त्या मजूरांसाठी, शेतकऱ्यांसाठी आहे जे प्रत्येक ऋतूमध्ये देशवासियांसाठी दिवस-रात्र परिश्रम करतात, हे पॅकेज देशाच्या विकासासाठी आपलं योगदान देणाऱ्या, प्रामाणिकपणे टॅक्स भरणाऱ्या मध्यमवर्गियांसाठी आहे. कुटीर उद्योग, गृह उद्योग, लघु उद्योग, MSMEसाठी असणार आहे.
● प्रत्येक भारतीयाने आपल्या ‘लोकल’साठी ‘वोकल’ बनायचं आहे. लोकल ब्रँडला ग्लोबल ब्रँड बनवायचं आहे. केवळ लोकल प्रोडक्ट्स खरेदी करायचे नाही तर लोकल प्रोडक्ट्सचा अभिमानान प्रचारही करायचा आहे. आपला संपूर्ण देश हे करु शकतो. स्वदेशी वस्तूंच खरेदी करण्याचं मोदींनी आवाहन केलं आहे.
● लॉकडाऊनचा चौथा टप्पा पूर्णपणे नव्या रंग-रुपातील आणि नव्या नियमांचा असणार आहे. विविध राज्यातून आलेल्या सल्ल्यांनुसार, लॉकडाऊन 4.0 बाबतची माहिती 18 मेआधी देण्यात येणार आहे.











