
चेपॉक (Chepauk) स्टेडियमवर इंग्लंडने यजमान टीम इंडियाचा (Team India) पहिला डाव 329 धावांवर गुंडाळला. रिषभ पंतने (Rishabh Pant) दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला आपला आक्रमक खेळ सुरूच ठेवला आणि 7वे कसोटी अर्धशतक झळकावले. इंग्लंडकडून फिरकीपटू मोईन अलीने (Moeen Ali) सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. जॅक लीचला 2 तर ओली स्टोनला 3 आणि जो रूटला 1 प्रत्येकी विकेट मिळाली. रोहित शर्माने (Rohit Sharma) पहिल्या डावात यजमान भारतीय संघासाठी सर्वाधिक 161 धावा केल्या. उपकर्णधार अजिंक्य रहाणेने 67 तर पंतने नाबाद 58 आणि चेतेश्वर पुजाराने 21 धावांचे योगदान दिले.
रविचंद्रन अश्विनने 13 धावा केल्या. संघासाठी पहिल्या दिवशी शुभमन गिल आणि कर्णधार विराट कोहली तर दुसऱ्या दिवशी इशांत शर्मा शून्यावर माघारी परतला. या सामन्यात पहिल्या दिवशी टॉस जिंकून भारतीय कर्णधार कोहलीने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, सुरुवातीला संघाने नियमित अंतराने 3 विकेट गमावल्या
दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने 6 बाद 300 धावांपासून दिवसाच्या खेळाला सुरुवात केली, पण मोठया धावसंख्येपर्यंत मजल मारू शकली नाही. सामन्याच्या सुरुवातीलाच मोईनने टीम इंडियाला एकाच ओव्हरमध्ये 2 धक्के दिले आहेत.
पदार्पणवीर अक्षर पटेलला बाद केल्यानंतर मोईनने इशांतला शून्यावर माघारी धाडलं. पहिल्या दिवशी कोहलीसह गिल आणि पुजारा स्वस्तात बाद झाल्यावर रोहित आणि रहाणे यांच्यात चांगली भागीदारी झाली. रोहित शर्माने आपल्या कसोटी कारकीर्दीचे 7वे शतक ठोकले तर, रहाणेने 23वे कसोटी अर्धशतक करून पॅव्हिलियनमध्ये परतला. दोघांमधील चौथ्या विकेटसाठी 161 धावंच्या भागीदारीने संघाचा डाव सावरला आणि मोठ्या धावसंख्येचा पाय रचला.
चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पाहुण्या संघाने जिंकत सिरीजमध्ये 0-1 आघाडी घेतली आहे.











