
शिमग्याच्या उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसमोर विघ्न उभे राहण्याची शक्यता आहे. कारण, होळीसाठी कोकणात (Konkan Holi) येणाऱ्या चाकरमन्यांची कोरोना चाचणी (Coronavirus) केली जाणार आहे. ही चाचणी नेगेटिव्ह आली तरच चाकरमन्यांना आपल्या गावात प्रवेश मिळेल.
प्रशासनाकडून जिल्ह्याच्या सीमेवर तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत यासंदर्भातील आदेश काढले जातील. त्यानंतर कोकणात जाणाऱ्या नागरिकांची कोरोना टेस्ट करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ होईल, अशी माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.
गपणती आणि होळी हे कोकणातील दोन मोठे सण मानले जातात. होळीच्या काळात कोकणातील गावांमध्ये ग्रामदेवतेच्या पालख्या निघतात. त्यासाठी शहरातील लोक मोठ्याप्रमाणावर कोकणातील आपल्या गावी जातात.
गेल्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचल्यामुळे चाकरमान्यांना कोकणात येण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे अनेकजण गावी जाऊ शकले नव्हते.
यंदाही होळीच्या काळात कोकणात अशीच गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून आतापासूनच योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.











