
इंग्लंड विरुद्ध भारतीय महिला क्रिकेट यांच्यातील 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. या विजयासह भारतीय संघाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला फलंदाजीचे आव्हान दिले. प्रथम फलंदाजी करण्यासाठी भारताने 20 षटकात 4 विकेट्स गमावून इंग्लंडसमोर 149 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या संघाला 8 धावांनी पराभव स्वीकारावा लागला आहे.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या शेफाली वर्मा (48 धावा, 38 चेंडू) आणि स्मृती मानधना (20 धावा, 16 चेंडू) भारताला चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेट्ससाठी 70 धावांची भागिदारी केली. त्यानंतर स्मृती मानधना बाद झाली. तिच्यापाठोपाठ शेफाली देखील बाद झाली. त्यानंतर हरमनप्रीत कौर आणि दिप्ती शर्मानं संघाची बाजू सावरली. मात्र, संघाची धावसंख्या 112 असताना हरमनप्रीत बाद झाली. तिने 25 चेंडूत 31 धावा केल्या. यात 2 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. त्यानंतर रिचा घोष अवघ्या 8 धावा करून माघारी परतली. 20 षटकांचा खेळ संपला तेव्हा दीप्ती शर्मा नाबाद 24, तर स्नेह राणा नाबाद 8 या धावसंख्येवर होते. भारतीय महिला क्रिकेटपटूच्या खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर 148 धावांचे लक्ष्य ठेवले.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उरतलेल्या टम्सिनने इंग्लंडला दमदार सुरुवात करून दिली. तिने 50 चेंडूत 59 धावा ठोकल्या. मात्र, ती बाद झाल्यानंतर इंग्लंडचा संघ डगमगताना दिसला. अखेर भारताने इंग्लंडला 8 धावांनी पराभूत केले. ज्यामुळे इंग्लंडच्या संघाला मालिका खिशात घालण्याची संधी गमवावी लागली आहे.











