
राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुरामुळे अनेकांची घरे उद्धवस्त झाली आहेत. तर लाखो लोकांना पुराच्या पाण्यात सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. त्याचसोबत शंभराहून अधिक जणांचा मृत्यू, काहीजण बेपत्ता आणि यामध्ये गुरांचा सुद्धा नाहक बळी गेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच पुरग्रस्त भागाचा दौरा करत पुरग्रस्तांना आधार दिला आहे. याच पार्श्वभुमीवर आता राज्याचे मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुरग्रस्त नागरिकांना 10 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचसोबत दरडग्रस्तांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये दिले जातील असे ही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.
पुरामुळे फटका बसलेल्यांची यादी महिन्याभरातच तयार केली जाणार आहे. त्यानुसार जे बाधित आहेत त्यांना जमिन आणि एका वर्षाच्या आतमध्ये त्यांचे पुर्नवसन केले जाणार आहे. पुरामध्ये जखमी झालेल्यांचा संपूर्ण खर्च सरकारकडून केला जाणार असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
सात बचाव कार्याच्या तुकड्या रत्नागिरी, रायगड येथे तैनात करण्यात आल्या आहेत. तर पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढल्यानंतर त्या मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती वेस्टर्न नेवल कमांड यांनी म्हटले आहे.






