
कोलोंबो (Colombo) येथे झालेल्या टी-20 मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने (Indian Team) यजमान श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) 38 धावांनी दणदणीत विजय मिळवून विजयासह मालिकेची सुरुवात केली. भारताने पहिले फलंदाजी करून सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) 50 आणि कर्णधार शिखर धवनच्या 46 धावांच्या जोरावर 164 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात यजमान संघ 18.3 ओव्हरमध्ये 126 धावाच करू शकला. भारताच्या विजयात सूर्यकुमारने बॅट तर भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) बॉलने महत्वपूर्ण योगदान दिले. श्रीलंकेकडून चरीत असालंकाने (Charith Aslanka) सर्वाधिक 44 धावा काढल्या तर सलामीवीर अविष्का फर्नांडोने 26 धावांचे योगदान दिले. कर्णधार दासुन शनका 16 धावा करून परतला. दुसरीकडे, धवन ब्रिगेडसाठी भुवनेश्वरने 4 तर दीपक चाहरने 2 विकेट्स काढल्या. तसेच कृणाल पांड्या, युजवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती व हार्दिक पांड्या यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.
भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना अविष्का फर्नांडो व मिनोद भानुका यांनी जोरदार सुरुवात केली पण संघाला नियमित अंतराने विकेट्स गमावण्याची फटका बसला. सलामीवीर मिनोद भानुकाने 10 धावा केल्या. यानतर युजवेंद्र चहलने धनंजय डी सिल्वाला 9 धावांवर बाद पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. पुढील ओव्हरमध्ये लगेच भुवनेश्वर कुमारने सलामीवीर फर्नांडोला 26 धावांवर संजू सॅमसनकडे झेलबाद केलं. धावांची संघर्ष करणाऱ्या अशेन बंडाराला हार्दिंक पंड्याने 9 धावांवर माघारी धाडलं. चरीत असालंकाने आक्रमक फलंदाजी करत संघाच्या आशा पल्लवित ठेवल्या होत्या. पण दीपक चाहरच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रत्यनात झेलबाद बाद झाला. यामुळे भारत व विजयामधील मोठा अडथळा दूर गेला. 16 व्या षटकात चाहरने असालंकाला बाद केल्यानंतर मैदानात आलेल्या वानिंदू हसरंगा शून्यावर बाद केलं. त्यानंतर वरुण चक्रवर्तीने यजमान संघाच्या उर्वरित आशा संपुष्टात आणल्या व कर्णधार दासून शनाका याला 16 धावांवर यष्टीचित केलं.











