एनसीबीच्या पंचानेच समीर वानखेडेंसह एनसीबीवर केले आरोप

जावयाला अटक केल्यामुळेच नवाब मलिक एनसीबीवर आरोप करत असल्याचा दावा होत असतानाच आता एनसीबीच्या पंचानेच समीर वानखेडेंसह एनसीबीवर बॉम्ब टाकला आहे. आर्यन खानला अटक केल्यानंतर शाहरुख खानकडे 25 कोटी रुपये मागण्यात आले होते. त्यातील 8 कोटी रुपये वानखेडेंना देण्यात येणार होते आणि बाकीचे वाटून घेण्यात येणार होते, असा दावा या पंचाने केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. केपी गोसावी आणि सॅम डिसूझाचं मी फोनवरील संभाषण ऐकलं होतं. 25 कोटींचा बॉम्ब टाका. 18 कोटीपर्यंत डील फायनल करू. त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असं या दोघांमध्ये संभाषण झाल्याचं साळी यांचा दावा आहे. आपण केपी गोसावी यांचे बॉडीगार्ड असल्याचा दावाही साईल यांनी केला आहे.

गोसावी आणि सॅम यांनी समीर वानखेडेंशी 18 कोटी आणि 8 कोटींची चर्चा केली होती. क्रुझवर छापेमारी झाल्यानंतर शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि केपी गोसावी तसेच सॅमला निळ्या रंगाच्या मर्सिडीजमध्ये पाहिले होते. या तिघांमध्ये 15 मिनिटे चर्चा झाली होती, असा दावाही त्यांनी केला आहे.

त्यानंतर गोसावीने मला फोन केला आणि पंच म्हणून राहण्यास सांगितलं. एनसीबीने 10 कोऱ्या कागदांवर माझी सही घेतली. तसेच मी गोसावींना 50 लाखांच्या दोन बॅगाही दिल्या होत्या, असंही प्रभाकर साईलनी सांगितलं. 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजून 45 मिनिटाने गोसावीने मला फोन केला होता. तसेच 2 ऑक्टोबर रोजी 7.30 वाजेपर्यंत तयार राहण्यास मला सांगण्यात आलं. गोसावींनी मला काही फोटोही पाठवले होते. फोटोत जे लोक दिसत आहेत, त्यांचे हे फोटो मला दाखवण्यात आले होते. ग्रीन गेटवर याच लोकांची ओळख पटवण्यास सांगितल्याची धक्कादायक माहितीही साईल यांनी दिली आहे.

क्रुझवरील धाडसत्राच्या रात्री आपण गोसावी सोबतच होतो. गोसावी आणि सॅम यांना एनसीबीच्या कार्यालयाबाहेर एकत्र पाहिल्याचा दावाही त्यांनी केला. गोसावी नाट्यमयरित्या गायब झाला आहे. त्याच्या जीवाला समीर वानखेडेकडून धोका असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

सौजन्य: TV9 मराठी आणि ABP माझा