
भारताविरुद्ध (India)तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत यजमान दक्षिण आफ्रिकेने (South Africa) दुसऱ्या वनडेत वर्चस्वपूर्ण विजयासह 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. भारतीय गोलंदाजांचा फ्लॉप शो यंदाही सुरूच राहिला. Proteas संघाला दिलेल्या 288 धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाला (Team India) 7 विकेटने पराभवाचे तोंड पाहायला लागले. जानेमन मालने (Janneman Malan) सर्वाधिक 91 धावा चोपल्या तर बावुमाने 35 धावा केल्या. तसेच सलामीवीर क्विंटन डी कॉकने 73 धावांची तडाखेबाज केली केली. विशेष म्हणजे डी कॉक आणि मालनने सलामीसाठी 132 धावांची भागीदारी रचत पाय भक्कम केला. भारतासाठी शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी एक विकेट घेतली.
पार्लच्या बोलंड पार्क येथे सलामीच्या दोन्ही सामन्यात भारतीय संघाची गोलंदाजी कमकुवत दिसली. रिषभ पंतच्या 85 आणि केएल राहुलच्या 55 धावांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने दुसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 288 धावांचे लक्ष्य ठेवले. भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 6 गडी गमावून 287 धावा केल्या. शार्दूल ठाकूरने नाबाद 40 आणि रविचंद्रन अश्विन 25 धावा करून नाबाद राहिले. प्रत्युत्तरात डी कॉक-मालनच्या जोडीने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला.
टीम इंडिया पहिल्या विकेटसाठी संघर्ष करत असताना डी कॉकने अर्धशतकी पल्ला गाठला. पण चांगल्या सुरुवातीचे तो मोठ्या खेळीत रूपांतर करू शकला नाही ठाकूरच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. तथापि मालन आणि बावुमाने तळ ठोकून फलंदाजी करून संघाला विजयीरेष ओलांडून दिली. मालन आणि बावुमा यांच्यातील दुसऱ्या विकेटसाठी 80 धावांच्या भागीदारीने संघाला विजयाच्या जवळ नेले. यानंतर मालन शतक साजरं करण्यापूर्वी बाद झाला तर लगेचच बावुमा देखील तंबूत परतला. एडन मार्करम आणि रसी वॅन डर डुसेनच्या अर्धशतकी भागीदारीने संघाला विजयीरेष ओलांडून दिली. मार्करम 37 धावा आणि डुसेन 37 धावा करून नाबाद परतले.
यापूर्वी केएल राहुल आणि शिखर धवनने भारतासाठी 63 धावांची भागीदारी करून दमदार सुरुवात करून दिली. पण सलग दोन धक्के बसले आणि धवननंतर विराट कोहली भोपळा न फोडता तंबूत परतला. यानंतर राहुल आणि पंत भारताचा डाव 64/2 धावांपासून सांभाळला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 115 धावांची भक्कम भागीदारी केली. पंतने आक्रमक भूमिका घेत 71 चेंडूत 10 चौकार आणि 2 चौकारांसह 85 धावा केल्या. दुसरीकडे, राहुलने अतिशय संथ अर्धशतक झळकावले आणि 79 चेंडूत 4 चौकारांने 55 धावा केल्या. तसेच शार्दुल ठाकूर आणि रविचंद्रन अश्विन यांनी अंतिम षटकांमध्ये भारताचे कोणतेही नुकसान होऊ दिले नाही व संघाला 287 धावांपर्यंत मजल मारून दिली.











