कोकणातील शिमगोत्सव / होलिकोत्सव

कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा हा सण अधिक मोठ्या प्रमाणात साजरा होतो. तिथे हा सण सुमारे ५ ते १५ दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो.

पालखी

यामध्ये मुख्य काम म्हणजे ग्रामदेवतेची पालखी सजवून त्यात रुपे (देवीच्या उत्सवमूर्ती) ठेवून पालखी देवळातून सहाणेवर आणणे. सहाण ही जागा मुख्यत्वेकरून गावातील चावडी असते. तर गावदेवीचे देऊळ हे दूर जंगलात असते. तर पालखी सजवून ढोल-ताशाच्या गजरात सहाणेवर आणायची ती होळीच्या दिवशी संध्याकाळी. त्यानंतर पालखी नाचवण्याचा कार्यक्रम सुरू होतो.

त्यानंतर रात्री आंब्याच्या किंवा सुरमाडाच्या झाडाची होळी तोडून आणणे. हे काम जिकिरीचे आणि जबाबदारीचे असते. प्रसंगी सुमारे ५० ते ७० फूट उंचीचे, अंदाजे १५ वर्षे वयाचे, आणि सुमारे १२०० ते १५०० किलो वजनाचे झाड तोडून ते गावकरी खांद्यावरून नाचवत सहाणेवर पालखीसमोर आणून उभे करतात. हे सगळे होईपर्यंत पहाट होते. मागच्या वर्षीच्या होळीचा जो खुंट ज्या खड्ड्यात शिल्लक असतो, तोच खड्डा मोठा खणून त्यात होळीसाठी आणलेले झाड उभे करतात ,व त्याभोवती गवत रचून मग पालखी प्रदक्षिणा होते, आणि मग होम जाळला जातो. गावातील नवीन जोडपी या होमात नारळ देतात.

गार्‍हाणे, खुणा काढणे

दुसर्‍या दिवशी गावकरी परत सहाणेवर जमतात. तिथे होळीच्या शेंड्याखाली सगळं गाव उभा राहून ‘गार्‍हाणे’ नावाचा कार्यक्रम होतो, ज्यात मागच्या वर्षीचे नवस फेडणे आणि यावर्षी नवीन नवस करणे असा प्रकार असतो. त्यानंतर बैठक(गावची सभा) असते, ज्यात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होते.

त्यानंतर तिसर्‍या दिवशी पालखीने खुणा काढणे हा कार्यक्रम असतो, यामध्ये गावचा गुरव आदल्या रात्री एक नारळ सहाणे समोर पटांगणात जमिनीत लपवून ठेवतो . तो नारळ पालखी हुडकून काढते. हा कार्यक्रम पाहण्यासाठीही गर्दी होते.