
मुंबई – शेती आणि कर्जाच्या समस्येबाबत गाऱ्हाणे मांडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न करणारे शेतकरी आणि त्यांच्या 8 वर्षीय लहान मुलीला पोलिसांनी मातोश्री बाहेरून ताब्यात घेतले होते. देशमुख असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी पनवेलवरून वांद्रे येथील मातोश्री येथे आले होते. मात्र, या शेतकऱ्यास पोलिसांनी सोडून द्यावे, असे आदेश मातोश्रीवरुन देण्यात आले आहेत.
देशमुख हे सदरील शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडलेले होते. तसेच त्यांनी आपली समस्या घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा वारंवार प्रयत्न केला होता. त्यांची भेट होऊ शकली नव्हती. अखेरीस आज ते आपल्या लहान मुलीसह मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर आले. मात्र, तेथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना अडवले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्या मुलीला ताब्यात घेतले. त्यावेळी या शेतकऱ्यासह छोट्या मुलीला धक्काबुक्की झाली.






