राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक कांचन नायक यांचं निधन

पुणे- राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक कांचन नायक यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी अल्पशा आजाराने पुण्यात निधन झाले.

स्मिता तळवलकर निर्मित ‘कळत नकळत’ आणि ‘विश्वनाथ एक शिंपी’ या त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

सुमारे ४० वर्षांहून अधिक काळ ते दिग्दर्शन क्षेत्रात सक्रिय होते.

जब्बार पटेल, राजदत्त, दिनकर डी पाटील यांच्यासोबतही त्यांनी काम केलं होते. त्यांना ७ राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांनी ज्युरी म्हणून काम पाहिले होते.

चित्रपटांसोबत त्यांनी अनेक माहितीपटांचे आणि टेलिफिल्मचे दिग्दर्शन केले होते.

सोमवारी (दि.१५) दुपारी एक वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.