
दिल्ली : चीन आणि भारत यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक सुरु आहे. या बैठकीला सोनिया गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक पक्षाचे नेते उपस्थित आहेत, या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, आम्ही सैनिकांसोबत त्यांच्या कुटुंबासोबत आहोत अशी ग्वाही दिली.
भारत शांत आहे. याचा अर्थ आम्ही दुबळे आहोत असा होत नाही. भारत मजबूत आहे, मजबूर नाही. आमच्यात डोळे काढून हातात देण्याची क्षमता आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर चीनला इशारा दिला.
दरम्यान, या बैठकीला शरद पवार यांनीही भाष्य करत राहुल गांधींच्या विधानाचा समाचार घेतला. देशाचे संरक्षण मंत्री राहिलेले शरद पवारांनी सांगितले की, सैनिक कधी, केव्हा हत्यार सोबत ठेवणार आणि कुठे नाही हे आंतरराष्ट्रीय करारानुसार निश्चित झालं आहे. अशा संवेदनशील मुद्द्यावर बोलताना आपल्या सावधता बाळगली पाहिजे असं त्यांनी सांगितले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत शरद पवारांनी हे वक्तव्य केले.











