
मुंबई – अनलॉक-१ अंतर्गत देशात हळूहळू व्यवहार सुरळित होत आहेत. परंतु, याचदरम्यान कोरोनाबाधितांची संख्याही वाढताना दिसत आहे. शनिवारी मुंबईत २ हजाराहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर मुंबई पोलिसांनी सख्तीचे धोरण अवलंबले आहे. त्यांनी नागरिकांच्या खरेदीला निर्बंध घातलेले नाहीत. परंतु, त्यांनी आता किलोमीटरची मर्यादा घालून दिली आहे.
मुंबई पोलीस दलाचे प्रवक्ता प्रणय अशोक यांनी रविवारी याची घोषणा करताना सांगितले की, केवळ कार्यालयाला जाणे किंवा अति महत्त्वाच्या स्थितीत उपचारासाठी सामान्य नागरिकांना दोन कि.मी.च्या परिसरापुढे जाण्यास परवानगी असेल.
खरेदीसाठी आपल्या घराच्या २ कि.मी क्षेत्राबाहेर जाण्यास सख्त मनाई आहे. नागरिक आपल्या वाहनांमधून सहलीच्या मुडमध्ये मुंबईत विनाकारण फिरताना आढळून आले होते. त्यामुळे पोलिसांना हे पाऊल उचलावे लागले आहे.
पोलिसांनी या महिन्याच्या सुरुवातीला व्यायामाच्या हेतूने खुल्या स्थळावर जाण्यास परवानगी दिली होती. परंतु, ही सूट दोन कि.मी.च्या पुढे जाण्यास नसेल.











