
शेतकऱ्यांनी उद्या म्हणेजच 8 डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. त्यामुळे राज्यातील काही सुरु आणि बंद राहणार आहेत. याच पार्श्वभुमीवर मुंबईत मात्र बेस्ट बस सेवा, टॅक्सी युनियन आणि ऑटो रिक्षा सेवा नागरिकांसाठी सुरु राहणार आहेत.
मुंबई महापालिकेने बेस्ट सेवेसंदर्भात माहिती देत असे म्हटले आहे की, भारत बंदच्या दरम्यान बेस्ट सेवा सुरु राहणार आहेत. परंतु बसला नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लोखंडी जाळ्या आणि अन्य संरक्षणात्मक गिअर्स हीवापरले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
त्याचसोबत टॅक्सी युनियन कडून ही भारत बंदच्या दिवसासाठी एक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ते आंदोलनात सहभागी होणार नाही आहेत. त्यामुळे कॅब आणि ऑटो रिक्षा या सुद्धा नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध असणार आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारच्या फार्म बिलाच्या विरोधात करण्यात येणाऱ्या आंदोलनाला विरोधी पक्षांकडून पूर्णपणे पाठिंबा दर्शवला गेला आहे. तर कालच शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत या आंदोलनाला पाठिंबा द्यावा अशी विनंती केली होती. त्यानुसार आता शिवसेना ही या फार्म बिलाच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवणार आहे. त्याचसोबत आम आदमी पार्टी, काँग्रेसने ही यामध्ये आपला सहभाग असणार असल्याचे म्हटले आहे.











