पंतप्रधानांनी बोलावली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक, कोरोणा संकताबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता?

भारतात कोरोना व्हायरस संसर्गाची दुसरी लाट आली आहे. कोरनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना संक्रमितांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण करावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे प्रयत्नशिल आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या शेवटच्या ताज्या आकडेवारीनुसार (29 एप्रिल 2021) गेल्या 24 तासात देशात 3,79,257 नागरिकांना कोरोनाचे संक्रमण झाले. तर 3645 जणांचा मृत्यू झाला. 

देशातील कोरोना व्हायरस (Coronavirus) प्रादुर्भावाचे संकट दिवसेंदिवस अधिकच उग्र स्वरुप धारण करत आहे. देशातील संक्रमितांची संख्या वाढते आहेच. त्यासोबतच कोरोना व्हायरस संसर्गामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. दुसऱ्या बाजूला देशात कोरोना लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे लसीकरण केंद्रे (Corona Vaccination Center) बंद पडत आहेत. औषध आणि पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची देशभर परवड होताना दिसते आहे. त्यामुळे संभाव्य स्थितीवर केंद्र सरकारने काहीतरी तोडगा काढावा अशी मागणी जोर धरत आहे. दरमयान, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांनी आज (30 एप्रिल) केंद्रीय मंत्रिमंडळाची एक बैठक बोलावली आहे. 

देशात कोरोना संक्रमितांनी उपलब्ध नसलेले बेड, औषधं आणि लस यामुळे देशभरात अस्वस्थता आहे. देशातील स्थिती इतकी भीषण झाली आहे की, कोरोना मुळे अथवा इतर कोणत्याही कारणाने रुग्ण दगावला तर त्याच्यावर स्मशाणभुमीत अंत्यसंस्कार करण्यासही रांग लावावी लागत आहे.

देशात असलेली ही अस्वस्थता सर्वोच्च न्यायालयातही पोहोचली आहे. सर्वोच्च न्यायालायने देशातील कोरोना व्यवस्थापनाच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारला चांगलेच झापले आहे. इतकेच नव्हे तर कोरोना व्हायरस संकट निपटण्यासाठी केंद्र सरकारने कोणते राष्ट्रीय धोरण आखले? असा सवालही न्यायालयाने विचारला. त्यामुळे केंद्र सरकार आता काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता आहे.