
दहावीची परीक्षा होणार की अंतर्गत मूल्यमापन करून निकाल जाहीर करणार या निर्णयावर 1 जूनला मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याप्रकरणी न्यायालय काय निर्णय देणार याकडे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
मुंबई उच्च न्यायालयात शालेय शिक्षण विभागाकडून 28 मे रोजी दहावीच्या परीक्षा, मूल्यमापन पद्धती यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर केले जाणार आहे. त्यानंतर 1 जून रोजी त्यावर सुनावणी होणार आहे.
शालेय शिक्षण विभागाकडून सादर करण्यात येणारे प्रतिज्ञापत्र दहावीच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी असेल अशी अपेक्षा पालक संघटनांकडून केली जात आहे. मात्र न्यायालयाने परीक्षा घेण्याचा निर्णय दिल्यास त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती इंडिया वाइड पॅरेण्टस् असोसिएशनच्या अॅड. अनुभा सहाय यांनी दिली.
दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला. मात्र त्यासंदर्भात मूल्यमापन पद्धती काय असावी याचा कोणताही धोरणात्मक निर्णय जाहीर केला नाही. त्यामुळे हा विषय न्यायालयापर्यंत पोहोचला आहे, असा दावा पालक संघटनांकडून करण्यात आला आहे.






