
वृत्तसंस्था
मुंबई / मुंबईच्या समुद्रात क्रुझवरील पार्टीवर एनसीबीने टाकलेला छापा पूर्णपणे बनावट आणि एका योजनेद्वारे करण्यात आला असून आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांच्यासारख्या हायप्रोफाइल आरोपींना भाजपचे पदाधिकारी पकडून ओढत नेत होते, असे सांगतानाच क्रूझवर कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थ सापडले नसल्याचा स्फोटक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
हा स्फोटक दावा करताना नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत काही व्हिडिओ आणि फोटो दाखवले. या फोटो आणि व्हिडिओमध्ये काही लोक आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांना अटक करून ओढत नेत होते. हे पकडून नेणाऱ्या लोकांमध्ये जे. पी. गोसावी आणि मनीष भानुशाली यांचा समावेश आहे. मनीष भानुशाली हे भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असून त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, आशीष शेलार अशा नेत्यांसोबत फोटो आहेत. के. पी. गोसावी हे देखील भाजपचे पदाधिकारी आहेत. असे असताना हे लोक एनसीबीच्या छापेमारीत कसे?, गोसावी आणि भानुशाली यांचा एनसीबीशी संबंध काय, असे सवाल उपस्थित करत याचा खुलासा एनसीबीने करावा असे आवाहन नवाब मलिक यांनी केला आहे.
क्रूझवर कोणताही अमली पदार्थ सापडलेला नाही- मलिक
पत्रकार परिषदेत मलिक यांनी जप्त करण्यात आलेल्या काही अमली पदार्थांचे फोटो दाखवले. हे अमली पदार्थ क्रूझवर जप्त केलेले नसल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे. कारण हे अमली पदार्थ विभागीय संचालकांच्या कार्यालयातील असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. छापेमारी मध्ये पंचनाम्याची एक कायदेशीर प्रक्रिया असते. त्या प्रक्रियेनुसार ही छापेमारी झालेली नाही हेच या फोटोवरून सिद्ध होत आहे आणि म्हणूनच हा छापा पूर्णपणे बनावट असल्याचा दावा मलिक यांनी केला.
एनसीबीने असे जाहीर केले आहे की गोसावी आणि भानुशाली आमचे अधिकारी नाहीत. मग असे असेल तर आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांना अटक करून ते कसे घेऊन जात आहेत?, कोण्या खासगी व्यक्तींना एनसीबीच्या कारवाईत काम करता येते का?, एनसीबीने खासगी लोकांना बोलावले होते का?, याचा खुलासा एनसीबीने केला पाहिजे, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
गेल्या एका वर्षभरापासून सर्व माध्यमांनी एनसीबीसाठी आपले प्रतिनिधी तयार करून ठेवले आहेत. सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर बिहारमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आणि सीबीआयकडे हे प्रकरण देण्यात आले. त्यानंतर ड्रग्समुळे त्यांची हत्या केली गेली अशा बातम्या येऊ लागल्या. तेव्हापासून बातम्या पेरल्या गेल्या. बॉलिवूडला बदनाम करण्यात आले. त्यानंतर कलाकारांना समन्स देऊन बोलावण्यात आले. त्यानंर असा समज निर्माण केला की संपूर्ण बॉलिवूड हे ड्रग्ज रॅकेटचे नेक्सस झाले आहे असे मलिक म्हणाले.
याच मालिकेत ३ तारखेच्या संध्याकाळी क्रूझवर एनसीबीने छापा टाकला. त्यानंतर एएनआयने आपल्या माध्यमातून काही व्हिडीओ दाखवण्यास सुरुवात केली. ज्यामध्ये एनसीबी ने ज्यांना ताब्यात घेतले होते त्यांचे फूटेज होते. त्याआधी झोनल संचालक यांनी ८ ते १० लोकांना ताब्यात घेतल्याचे म्हटले होते. एका व्हिडीओमध्ये एक अधिकारी आर्यन खानला एनसीबीच्या ऑफिसमध्ये घेऊन जात असल्याचे दिसले. त्यांनर त्याच व्यक्तीचा आर्यन सोबत सेल्फी व्हायरल झाला. त्यानंतर एएनआयने दिल्लीच्या अधिकाऱ्यांकडून एक बातमी दाखवली की हा एनसीबीचा अधिकारी नाही. त्यामुळे ही व्यक्ती कोण हा प्रश्न निर्माण होत आहे. हा एनसीबीचा अधिकारी नाही तर आर्यन खानला तो कार्यालयात कसा घेऊन गेला? याचे उत्तर एनसीबीला द्यावे लागेल असेही सवाल नवाब मलिक म्हणाले.











