शहरे की प्रदुषणाचा भस्मासुर ?

भारतातील सर्व प्रमुख शहरे ही प्रदूषणाची गंभीर पातळी गाठून चिंताजनक बनली आहेत. परंतु, त्यावर उपाय करण्याचा कोणताही पर्याय समोर न येता आपण अज्ञानानेच या संहाराला सामोरे जाऊ, अशी स्थिती आली आहे…
शहरीकरण हा अर्थव्यवनस्थेचा अनिवार्य घटक आहे. खेड्यात रोजगार मिळत नाही, शेतीचे उत्पन्न हाता तोंडाची गाठ पडण्याएवढेही नाही, अशा अवस्थेत प्रत्येकजण शहराकडे ओढला जातो. परंतु या शहरांमध्ये मृत्यूचा अदृश्य सापळा आहे आणि तो दिसत नाही. विविध प्रदूषणांनी ही शहरे पोखरली असून त्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन, ‘जेव्हा कधी आपल्यावर येईल तेव्हा पाहू’ असा स्वार्थी आहे आणि त्याची किंमत मोजावी लागणार आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा अहवाल हा ‘प्रगती’च्या मागे लागलेल्या जनमानसाचे डोळे उघडणारा आहे. भारतातील प्रमुख शहरे ही प्रदूषणाची गंभीर पातळी गाठून आता चिंताजनक बनल्याचे हा अहवाल सांगतो. परंतु ह्याची गंभीर दखल घेऊन उपाय करण्याचा पर्याय समोर न येता हा अहवाल विस्मृतीत जाऊन आपण अज्ञानानेच ह्या संहाराला सामोरे जाऊ, अशी स्थिती आहे. याची भयावहता लक्षात येऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे आणि आपल्याला त्याचीही सवय झाली आहे.

ह्या संशोधकांनी २०१०च्या आकडेवारीवर केलेल्या अभ्यासाप्रमाणे आशियामध्ये तीन लाख लोक ह्या वायुप्रदूषणामुळे मृत्युमुखी पडतात. आपल्या फुफ्फुसात शिरलेले सूक्ष्म कण व ओझोनमुळे हे प्रमाण वाढले आहे. सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म अशा धूलिकणांमुळे व या धूलिकणांच्या फुफ्फुसांपर्यंत सहजपणे होणाऱ्या प्रवेशामुळे अर्धांगवायू, हृदयरोग आणि फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. २०१२ साली केलेल्या मूल्यांकनानंतर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO)च्या निष्कर्षाप्रमाणे घरातील व घराबाहेरील वायुप्रदूषणामुळे गेल्या वर्षी, सात लाख लोक हे सरासरी वयोमानाच्या अगोदर मृत्युमुखी पडले. आजवर भारतामध्ये सहा लाख पंचेचाळीस हजार अकाली मृत्यू हे केवळ हवेच्या प्रदूषणामुळेच झाले. याबाबत जागरूकता दिसत नाही.

आपल्या परिसरातील हवेची गुणवत्ता सांगणाऱ्या फलकाची, आपल्या मोबाइलवर हवेच्या गुणवत्तेची माहिती देणाऱ्या अॅपची आवश्यकता यातून अधोरेखित होते. परंतु सकाळी धावताना किती उर्जा खर्च झाली, किती वजन घटले याचा हिशेब ठेवणाऱ्या अॅपएवढीच याचीही गरज आहे. हे सर्व प्रदूषण आशियात आणि मुख्यतः चीन, भारत व पाकिस्तानमध्ये असल्याचे सर्वांत मोठे कारण म्हणजे आपले खनिज तेलावर व कोळशावर ऊर्जानिर्मितीसाठी असलेले अवलंबित्व. यातून अनिवार्यतेने प्रदूषण होणार हे माहिती असूनही मोठ्या प्रमाणावर झालेल्या ज्वलनक्रियेने हे सूक्ष्म कण हवेमध्ये पसरतात आणि या पुढे सूक्ष्म क्षेपणास्त्रांचे जीवघेण्या अस्त्रांमध्ये रूपांतर होते. यांच्यामुळे क्रयशक्ती व उपयोगिता कमी होते आणि प्रगतीवर व देशाच्या आर्थिक क्षमतेवर परिणाम होतो. शासनालाही त्याचे गांभीर्य कळत नाही. कळले तरी वळत नाही.
२.५ मायक्रॉनच्या सूक्ष्म धूलिकणांची निर्मिती ही मुख्यत: ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या शेणाच्या गोवऱ्या, लाकूड व इतर बायोमासच्या ज्वलनामुळे होते. केंद्र सरकारच्या बहुविध योजनांतून सर्वदूर गॅस पोहोचवून अशा मृत्यूंपासून ग्रामीण जनतेला वाचविण्याचे कामही होत आहे. तरीही स्वयंपाकासाठी प्रदूषण न करणारे इंधन म्हणून सोलरचा वापर होण्याची आवश्यकता आहे. यातल्या तांत्रिक आणि व्यावहारिक अडचणी सोडवण्याचे प्रयत्न व्हायला हवेत.

शेतीची कीटकनाशके व खते, अमोनियाच्या संयोगाने निर्माण होणारे अमोनिअम नायट्रेट व सल्फेटसारखी संयुगे, पशुपालनाच्या अवैज्ञानिक पद्धती यातून निर्माण होणारे ग्रीन हाऊस गॅसेस या सर्वांचाही हवेच्या प्रदूषणात मोठा वाटा आहे. ह्या सर्व प्रकारचे प्रदूषण मूलत: शेतकऱ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाशी संबंधित आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करताना त्याला विज्ञान व संशोधनाची जोड देऊन आवश्यक ते बदल करण्याची लवचिकता शेतकऱ्यांनी दाखविणे आवश्यक आहे. तसेच कृषी विद्यापीठे व इतर संशोधन संस्थांमध्ये होणारे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून ‘प्रदूषणाच्या’ नावाखाली त्याची लूट न होता त्याच्या ‘उत्पादनक्षमतेला’ धोका न पोहोचवता प्रयोग करणाऱ्यांची साखळी उत्पन्न होणे आवश्यक आहे. एकूणच वायुप्रदूषणामध्ये आपल्या शहरांच्या नावाची वर्णी लागली आहे ही गोष्ट अत्यंत गंभीरपणे घेऊन आपण आपल्या जीवनपद्धतीमध्ये योग्य तो बदल आणण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले तर गुणोत्तर पद्धतीने वाढणाऱ्या या वायुप्रदूषणाच्या परिणामांचे निर्मूलन करून आपण चांगले जीवन जगू शकू. वैज्ञानिक संशोधनाने वाढलेले आपले आयुर्मान विज्ञानाच्या दुरुपयोगामुळे व त्यातून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाने आपणच कमी करत आहोत हे लक्षात घेतले तर प्रगती आणि पर्यावरणसहयोगी प्रगतीमधील फरक आपल्याला दृष्टिक्षेपात यायला सुरुवात होईल. सस्टेनेबल डेव्हलपमेंटची व्याख्या ही प्रत्येक देशाप्रमाणे, जनसमूहाप्रमाणे बदलत जात आहे. जगाची ही व्याख्या समान करण्याचा प्रयत्न करणे आणि अशा समस्येवर जागतिक उपाययोजना स्वीकारणे हेच या समस्येचे एकमेव उत्तर आहे.