
मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आठ जणांची राज्याच्या विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर आता आज (१८ मे) दिवशी त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. दरम्यान नव्याने निवडून आलेले नऊ जण आज विधिमंडळामध्ये दुपारी १ वाजता शपथ घेतील.
दरम्यान यामध्ये शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि डॉ. निलम गोर्हे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अमोल मिटकरी आणि शशिकांत शिंदे, कॉंग्रेस पक्षाचे राजीव राठोड तर भाजपाचे प्रवीण दटके, रमेश कराड, रणजितसिंह मोहिते-पाटील, गोपीचंद पडाळकर या चार जणांचा समावेश आहे.
महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद निवडणुका घेण्याबाबत दुमत होते. मात्र उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद अबाधित ठेवण्यासाठी त्यांची विधिमंडळात निवड होणे गरजेचे होते. दरम्यान आता त्यांचा आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे. आज ते आमदारकीची शपथ घेतील.
दरम्यान महाराष्ट्रात विधान परिषद निवडणूक ही २१ मे या दिवशी होणार असं निवडणूक आयोगाने जाहीर केलं होतं. मात्र ही निवडणूक बिनविरोध करण्यात सार्याच राजकीय पक्षांना यश आलं आहे. दरम्यान कॉंग्रेस पक्षाकडून एक उमेदवार मागे घेण्यात आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्याबाबत शेवटच्या क्षणापर्यंत सार्यांच्याच मनात धाकधूक होती.











