
देशभरामध्ये जे कृषी कायदे लागू करण्यात आले आहेत त्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीसुद्धा दिल्लीत जाऊन केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता भाजपमध्ये मात्र चिंतेचे वातावरण झाले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांनी राळेगणसिद्धीत जाऊन आण्णांशी चर्चा केली. अण्णांच्या आंदोलनाची भाजपने धास्ती घेतल्यानेच या भेटी सुरू केल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.
दरम्यान काल राळेगणसिद्धीमध्ये पंजाबचे शेतकरी अण्णांच्या भेटीसाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी अण्णांशी चर्चा केली. यावेळी अण्णांनी शेतकरी आंदोलनाला आपला आधीपासूनचं पाठिंबा असल्याचं सांगतानाच आंदोलकांना बळ देण्यासाठी दिल्लीत येऊन आंदोलन करण्याचे आश्वासनही दिलं होतं. अण्णांनी दिल्लीत आंदोलन केल्यास हे आंदोलन आणखी तापून देशभरातील शेतकरी त्यात सामील होण्याची भीती असल्यानेच भाजप नेत्यांनी अण्णांची भेट घेण्यास सुरुवात केल्याचं कळतय .











