
ठाणे – मराठी आणि हिंदी चित्रपट, मालिका, नाटकांमध्ये विनोदी भूमिकांनी जनमानसात ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते लिलाधर कांबळी यांचे गुरूवारी वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी निलांबरी आणि तीन मुली असा परिवार आहे. कांबळी यांच्यावर ठाण्यातील बाळकुम येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून ते कर्करोगाशी लढा देत होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
कांबळी हे मुळ कोकणातल्या मालवणमधील रेवंडीचे. राजा गोसावी, बबन प्रभू, आत्माराम भेडे यांच्या पाठोपाठ मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत आपल्या विनोदी अभिनयाचा ठसा त्यांनी उमटविला. लेकुर उंदडे झाली, प्रेमा तुझा रंग कसा, आमच्या या घरात, यासह १०० हुन आधिक नाटकात त्यांनी भूमिका केल्या
वस्त्रहरण या नाटकातील जोशी मास्तर या भूमिकेने ते घराघरात पोहचले. काचेचा चंद्र ,हिमालायची सावली ह्यासारख्या नाटकातही त्यांच्या भूमिका लक्षणीय ठरल्या.
सिंहासन, हल्लागुल्ला, रंगत संगत, आई पाहिजे, सारेच सज्जन, जिगर, बरखा सातारकर, प्राण जाये पर शान न जाय, श्वास, बीज (हिंदी), सविता बानो, हंगामा, वन रूम किचन, सुकन्या या चिञपटांतून त्यांनी भूमिका साकारल्या.











